विजय नेहमी सत्याचाच होतो

happy women's day


जागतीक स्त्री दिन

       

      "स्त्री" ही अनेक रुपाने, अनेक गुणाने, अनेक भुमिकेत वावरताना आपण पहातो. बहीण, पत्नी व आई ही तिची आपल्याला माहीत असलेली रुपे आहेत. पण "आई" हे परमेश्वराने आपणा सर्वांसाठी निर्मिलेले सुंदर रुप आहे. ती अनंत जन्माची माता आहे, आणि हेच तीचे सर्वश्रेष्ठ रुप आहे. जगात सर्व काही पुन्हा पुन्हा प्राप्त होते, फक्त एकदाच प्राप्त होते ते मातृरुप. परमेश्वराने त्यात त्याच सर्वस्व प्राणपणाने ओतलय." कुपुत्रो सदा भवती कुमाता न भवती".  सर्वांत आधी ती एक स्त्री आहे, आणी तिच्या स्रीत्वाचा आदर करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे.

उर्मिला


 
      डोळे मिटून माधव आरामखुर्चीवर गॅलेरीत बसला होता. त्याच्या मनात विचारांचे काहूर माजलेले, एका मागोमाग एक अविरतपण उसळणारे. भुतकालातील आठवणींची पाखरे अवती भवती भिरभिरत चोचा मारुन काळजात छेद करत होती. हृदयात भावनांच्या कल्लोळाचा उठलेला आगडोंब शरीराचा दाह करत पसरत चालला होता. गतकालातील घटना सारख्या दृष्टीपटलावर आदळत होत्या. असह्य होऊन त्याने डोळे उघडले. बरीच रात्र झालेली. समोर रस्त्यावरील दिवे दिवसभरातील सुःखदुःखे एकमेकांशी शेअर करत गप्पांमध्ये रंगले होते. मध्येच एखादा दिवा मिणमिणत, दुःखद अंतःकरणाने आपल्या शेवटच्या अस्तीत्वाची जाणीव करुन देत तळमळत होता. रातकिड्यांच्या वाद्यवृंदाला आलेल्या बहराला मध्येच एखाद्या कुत्र्याचे भुंकणे व्यत्यय आणत होते. रातराणीचा आसमंतात दरवळणारा सुगंध घेउन मध्येच एखादी झुळुक त्याला दिलासा देण्याची व्यर्थ खटपट करीत पसार होत होती. चहूकडे  पसरलेले अंधाराचे साम्राज्य माधवच्या अस्वस्थतेला गडद करत होते. मान मागे वळवून माधवने सुस्कारा टाकला. वर आकाशात एक तारा वेगाने खाली पडता पडता नजरेआड झाला. उल्का होती ती, मनाशीच पुटपुटत माधव आठवणींच्या गर्दीतून बाहेर येण्याचा केविलवाणा प्रयत्न करता करता हळवा झाला. पापण्यानी आत्तापर्यंत रोखलेले थेंब बंड करुन दुतर्फा पसरले. स्फुंदत स्फुंदत माधव रडु लागला. पश्चातापाचे ते अश्रू त्याला चटक्याप्रमाणे वेदना देऊ लागले.

     सायंकाळी माधवच्या मित्राचा, अविनाशचा फोन आला होता. गदगदलेल्या कंठाने त्याने माधवला सांगीतले, "माधव उर्मिला आपल्याला सोडुन गेली रे, अनंताच्या प्रवासाला...." माधवच्या पुस्तकातील मोरपीस हरपले.

     माधव क्षोत्री, सुखी कुटुंबातील, दोन लहान बहीणींचा लाडका दादा, आई-वडील दोघेही एकाच कंपनीत नोकरीला. घरातील वातावरण दृष्ट लागण्यासारखे. पैशांची कमतरता नव्हती. माधवही चांगल्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत. जिद्द व मेहनतीच्या बळावर  कंपनीच्या प्रगतीला हातभार लावणारा,  वरिष्ठांच्या मर्जीतील कर्मचारी. गंभीरपणे वावरणारा माधव स्टाफमध्ये खडूस साहेब म्हणुन प्रसिद्ध. स्टाफ त्याला सदैव वचकून असे. पुर्वी तसा नव्हता तो, पण घडलेल्या एका घटनेने माधव अचानक बदलला होता. माधवचे आई-वडील एकत्र परदेशात प्रवास करताना विमान अपघातात गेले. त्याच्या कुटुंबावर झालेल्या दुहेरी आघाताने माधव सुन्न झाला. घरात तो एकमेव कर्ता पुरुष उरला होता. माधवच्या वडीलाना भाऊ-बहीण नव्हते. कोणी जवळचे नातेवाईकही नाही. बहीणीनी हंबरडा फोडून त्या शेजारच्या वैदेही काकूंच्या कुशीत शिरल्या, माधवला ते शक्य झाले नाही. राघव काकांच्या खांद्यावर डोके ठेवून मुसमुसत त्याने काकांचे उपरणे ओले केले. तेव्हापासून तो सदैव गंभीर चेहेरा घेउनच वागत असे, देवावरचा विश्वास उडाल्याने त्याच्यातील रुक्षपणा वाढत चालला होता. आजकाल जिद्दी, हट्टी व चिडचिडा झालेला, मनात अहंकाररुपी दुर्गुणाचा नकळत प्रवेश झाला, वागणुकीत तुसडेपणा आला. कामात स्वतःला गुंतवुन घेतलेल्या माधवला कर्तव्य सोडुन कसली भावनाच उरली नव्हती.

     एके दिवशी माधवचे कंपनीतील सहकारी पटवर्धन साहेब रिटायर्ड झाले. कंपनीने नवीन नेमणूक केली. सगळा स्टाफ नविन साहेबाच्या प्रतीक्षेत डोळे लावून बसलेला. आणी तिची एंट्री झाली.

     कंपनीच्या संचालकानी तिची ओळख सर्व स्टाफला करुन दिली. "ह्या उर्मिला देवधर आजपासून पटवर्धन साहेबांच्या हुद्यावर रुजू होताहेत." एक तरुणी मंद स्मित करत, सर्वाना अभिवादन करत आत प्रवेशत होती. भव्य कपाळाची, कुरळ्या केसांची, मोहक डोळ्यांची, गोरीपान, केसात गजरा, मध्यम उंचीची उर्मिला! संचालकांसोबत माधवच्या केबीनमध्ये आली. माधवने मान वर करुन पाहीले. साधारण पंचविशीची, साडी परीधान केलेली, चेहेर्यावर मेकअपचा लवलेशही नसलेली, आत्मविश्वासाचे तेज झळकत असलेली उर्मिला! त्याच्या समोर उभी होती. माधव अचंबीत होऊन तिच्याकडे पहातच राहीला, कारण आजपर्यंत ऑफीसमधील तरुणीना जीन्स, टी शर्ट,  ट्राउसर, लेगीन्स मध्ये वावरताना त्याने पाहीलेले, पण संपुर्ण भारतीय वेषभुशेत, गजरा माळून आलेल्या उर्मिलेच्या निरागस चेहेर्याने माधवला पहील्याच भेटीत घायाळ केले. क्षणभर त्याचे त्यालाच कळत नव्हते पण अंतरंगात झालेल्या खळबळीने तो पुरता गोंधळला होता. स्वतःला सावरत माधव खुर्चीतून उठला, आज खुप दिवसानी माधवला हसताना सगळे पहात होते. उर्मिलाने केलेल्या नमस्काराने माधव पुर्ण भानावर आला. त्यानेही स्वतःची ओळख करुन दिली. ती आजपासुन त्याची सहकारी म्हणून कंपनीत रुजू झाली.

     उर्मिलाच्या येण्याने ऑफीसला नवचैतन्य आले. गंभीर चेहर्याचा माधवही आजकाल सगळ्यांशी हसून खेळून वागू लागला. बदललेल्या ऑफीसची, विशेषतः माधवची जाणीव सर्व ऑफीसला झालेली, पण उर्मिलाला कसलाही गंध नव्हता किंवा तिच्या मनातही कधी असले विचार आले नव्हते.

     उर्मिला मुळची पुण्याची, आई-वडीलांची एकुलती एक, कुणी भाऊ बहीण नाही. वडीलांची पुण्यात स्वतःच्या मालकीची देवधर इंजीनीअरींग कंपनी. उर्मिलाच्या आई-वडीलांचा स्वभाव उत्तर-दक्षीण ध्रुवाप्रमाणे विरुद्ध.वडील शिस्तबद्ध, हेकेखोर, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव असलेले तर आई स्वातंत्र्य सैनीकाची कन्या. वडिल उर्मिलाचे लग्न करून तिला परदेशात स्थायिक करण्याची स्वप्ने पाहत असत. पण उर्मिलाच्या आईचे संस्कार, तिचे देशप्रेम दिवसेंदिवस उर्मिलाच्या मनावर बालपणापासून ठसत गेले.  उद्योगानिमित्ताने बाहेरच जास्त असल्यामुळे वडिलांचे प्रेम उर्मिलाला कमीच मिळाले. त्यांच्या विचीत्र स्वभावामुळे ती त्यांच्याशी नेहमी वचकुनच वागत असे. पण आईने तिच्यावर लहानपणापासूनच  आपल्या भारतीय संस्कृतीचा, वीर पुरुषांच्या त्यागाचा इतिहास बिंबविला. जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, ह्यांच्या कथा ऐकत ऐकत उर्मिला मोठी झाली. त्यामुळे उर्मिलाला देशाबद्दल अतोनात प्रेम!  उच्चशिक्षित असूनही तिचे पाय जमिनिवरच कायम राहिले. निगर्वी, निरागस, सर्वाना मदत करणारी उर्मिला... शाळा, कॉलेजमधे शिक्षकांची लाडकी  सर्वाना हवीहवीशी वाटणारी उर्मिला!
    
     आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची उर्मी हृदयात बाळगून तिची वाटचाल चालू होती. तिला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द होती, पण वडिलांच्या स्वभावामुळे तिने स्वतःच्या इच्छा-आकांक्षाना मुरड घातली. तिचे खरे लाड केले असतील तर ते तिच्या शेजारच्या जोशी काकांनीच. जोशी काकांची दोन्ही मुले लग्न करुन परदेशात स्थायिक झालेली, त्यांची उणीव ते उर्मिलाकडून भरून काढत. एकेदिवशी धीर करुन तिने  नोकरी करण्याचे मनोगत वडिलांना सांगितले. वडिलांनी काहीही विचार न करता वयात आलेल्या उर्मिलाला व तिच्या आईला बेदम मारले, व धमकी दिली. उर्मिलाने मनाशी ठरवले नोकरी करायचीच.. तिने वर्तमान पत्रातून आलेल्या जाहिराती वाचून इंटरव्ह्यु दिले व एक दिवस ती धर्माधिकारी इंटरनेशनलमधे जॉइन झाली. वडिलांनी तिच्याशी व तिच्या आईशी बोलणे बंद केले.
    
      धर्माधिकारी इंटरनेशनल मधील गंभीर वातावरण आता उर्मीलाच्या कामाच्या पद्धतीने व वागण्याने बदलत चालले होते. काम करता करता, हसत खेळत वावरण्याने सर्वाना मोकळे मोकळे वाटू लागले. ऑफिसमधे उर्मिलाच्या नेतृत्वाखाली धार्मिक सणही आता उत्साहात साजरे होऊ लागले. रुक्ष स्वभावाच्या माधवाच्या मनातही हिरवळ पसरु लागली. तो पूर्णपणे उर्मिलेच्या एकतर्फी प्रेमात पडला व दिवसेंदिवस गुरफटत चालला होता. मोकळ्या मनाच्या उर्मिलाला मात्र कशाचाही मागमुस नव्हता..
   
     एक दिवस उर्मिला कामावर आली नाही. बघता बघता चार दिवस झाले; फक्त फोनवर निरोप दिला होता, की महत्वाच्या कामामुळे येता येणार नाही. हे कंपनीच्या नियमात बसत नव्हते. योग्य व मुद्देसुद कारणाशिवाय असे कुणी रजा घेऊ शकत नव्हते. माधव अस्वस्थ झालेला, ती त्याच्या बरोबरीच्या पदावर त्याची सहकारी म्हणून कार्यरत होती. पण त्याला ही नक्की कारण माहीत नव्हते. संचालकांनी तिच्या घरी चौकशीसाठी कर्मचाऱ्याला पाठविले.
    
     पडलेल्या चेहऱ्याने व भांबावलेल्या स्थितीत कर्मचारी परतला. उर्मिलाच्या वडिलांनी तिच्यासाठी स्थळ आणले होते. मुलगा परदेशात मल्टिनॅशनल कंपनीत उच्चपदस्थ होता. कंपनीचा बंगला, गाडी, नोकर चाकर सर्व दिमतिला.. इतर बऱ्याच सुविधा.. उर्मिलाने शांतपणे नाही म्हटले. वडिलांनी घर डोक्यावर घेतले. बराच वादंग झाला, पण उर्मिला शांतपणे तिच्या निश्चयावर ठाम होती. तिच्या आईला त्यांनी खुप अपमानित केले व मारहाणही केली. उर्मिलाने मनाचा हिय्या करून तिच्या बाबांना ठणकावून सांगितले, "बाबा तुमचे वैभव, तुमचा मानमरातब, तुम्हाला लखलाभ होवो, मी माझ्या आईला घेऊन घर सोडतेय."  त्या अहंकारी माणसाला पाझर फुटला नाही. ती सध्या तिच्या आईसमवेत मावशीच्या घरी राहतेय. आईवर ह्या घटनेचा खुप परिणाम झालाय. ती सतत रडत असते.
    
     हप्त्यानंतर कोमेजलेल्या चेहऱ्याने उर्मिला ऑफिसला आली. अचानक गैरहजर राहिल्याबद्दल संचालकांची माफी मागितली. घडलेल्या प्रसंगाचे गांभीर्य जाणून धर्माधिकारी साहेबांनी तिचे सांत्वन केले व म्हणाले, "अगं कमीतकमी आम्हाला घडलेला प्रकार तरी कळवायचास ना! आम्ही काही ना काही मदत केली असती.. भविष्यात कधीही, कसलीही गरज भासली तर आम्ही आहोत. घाबरु नकोस, परमेश्वरावर विश्वास ठेव आणि कामाला लाग."
 
     सर्व शल्य मनात लपवून उर्मिला पुन्हा कामास लागली. आईच्या बँकेच्या ठेवी मोडून व दागिने विकुन उर्मिलाने त्यांचे स्वतःचे एक लहानसे घर घेतले. उर्मिलाच्या आईच्या मनात आता सदैव उर्मिलाची चिंता घर करून राहिली, पुढे कसे होणार उर्मिलाचे!  ह्या भयाने ती अधुनमधुन आजारी पडू लागली. उर्मिला आता घर सांभाळून ऑफिसला येत होती व आईलाही धीर देत होती.
 
     एकदा ऑफिसमधे कार्यक्रमाच्या निमित्ताने उर्मिलाची आई हजर होती. तिथे माधवचे वागणे तिच्या अनुभवी मनाने हेरले, जाणले. तिलासुद्धा तो आवडला होता. घरी आल्यावर तिने तसे उर्मिलाला विचारलेही. उर्मिलाने शांतपणे सांगितले "माझ्या मनात तसे काहीही नाही. त्याला माझ्याबद्दल काय वाटते, ह्याने मला फरक पडत नाही. मला माझे काम महत्वाचे आहे. आई दिवसेंदिवस त्याच्याबद्दल विचारायची व उर्मिलाला सांगायची. "मला तो भावला, तुझ्यासाठी योग्य वाटतो, बघ जरा विचार करून." आईची भूण भूण, तिचे प्रेम व वास्तवाचे भान ठेवून, एकदा उर्मिला म्हणाली, "आई तुझ्याच संस्कारात वाढलीय मी, तुझ्याइतके मला कोणीच ओळखत नाही, पण फक्त तुझ्या इच्छेखातर, फक्त तुझ्यासाठी मी विचार करीन.. पण मला वेळ हवाय. मला त्याला जाणून घ्यावे लागेल, नंतर तुला नक्की सांगेन, आता धीर धर, विश्वास ठेव माझ्यावर." आईला हायसे वाटले.
 
     आता उर्मिलाचा माधवकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. ती त्याला जाणून घेण्याचा प्रयास करू लागली. बोलता बोलता घरच्या गप्पा सुरु होऊ लागल्या. माधवच्या आई वडिलांची दुःखद घटना व लहान बहिणींची स्थिती जाणल्यावर ती हळहळली तिला सर्व परिस्थितीची जाणीव झाली. माधव तर पहिल्या दिवसापासूनच तिची स्वप्ने पाहू लागला होता. तिच्या जवळीकीची एकही संधी तो सोडत नव्हता. पण उर्मिलाने कधीही मर्यादा ओलांडली नाही.
    
     एकदा माधवबरोबर कॉफी घेताना माधवनेच विषय काढला.. तेव्हा उर्मिला म्हणाली, "माधव, लग्न म्हणजे फक्त पती- पत्नीचा विषय नाही, तर ते दोन घरांचे भविष्य असते. दोन्ही घरांचे आपुलकीचे,  विश्वासाचे धागे एकत्र बांधून जे आनंदात राहतात, त्याला लग्न म्हणतात. ज्यांच्यामुळे सासर व माहेर दोन्ही सुखात नांदते, ते खरे लग्न. मला लहानपणापासून ते सुख मिळाले नाही, पण मी इतरांना त्या सुखापासून वंचित ठेवू शकत नाही. 

     भगवान श्रीरामांना मी लहानपणापासून आदर्श मानलेय. स्वतःच्या सुखांवर पाणी ओतून, कर्तव्यनिष्ठ जीवन जगलेल्या पुर्णपुरुष, पुरुषोत्तम श्रीरामप्रभूंना मी त्यांच्या आदर्शासहित जपलय. पण मला राहून राहून कौतुक व आदर वाटतोय तो भगवान लक्षमणांचा. बघ ना! संपूर्ण आयुष्यभर त्यानी जे काही केलय ते त्याच्या रामासाठीच! स्वतःच्या जीवनाचा कण नि कण त्यानी त्यांच्या बंधुसाठी अर्पण केला; ते स्वतः देहाने जरी वेगळे असले तरी त्यानी त्यांचे स्वतःचे अस्तित्व कधी ठेवलेच नाही. काया, वाचा, मने रामरायांसाठीच झिजले व जगले भगवान लक्ष्मण. 

     भगवान लक्ष्मणांच्या जीवनकार्याची भव्यता, दिव्यता व श्रेष्ठता मला नेहमी विचार करण्यास भाग पाडते. त्याच्या इतका त्याग कोणी केला असेल असे मला वाटत नाही. अरे दशरथपुत्र असूनही त्यांचे खरे माता पिता श्रीराम व जानकीच होते. हे खूपच कमी लोक उमजू शकले. पण लक्ष्मण हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे..... त्यामुळे माझी काही मते आहेत, बघ पटली तर, जोपर्यंत तुझ्या दोन्ही बहिणींची लग्ने होऊन त्या संसार थाटत नाहीत, तोपर्यंत तू लग्नाचा विचार करू नकोस."
    
     माधवला विजेचा जबरदस्त झटका बसल्यासारखे झाले. तो उर्मिलेसाठी अधीर झालेला, पण तिचे विचार समजण्याइतकी दूरदृष्टि व मोठे मन अहंकारी माधवकडे नव्हते. तिचे विचार त्याला पटले नाहीत व उगाच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. उर्मिला घरी एकटीच वाढलेली, तिला बहिण भाऊ नाहीत.. तिला स्वतंत्र आयुष्य जगण्याची सवय लागली आहे, म्हणून तिचा हा बहाणा असेल. काहीही उत्तर देण्याचे सौजन्य न बाळगता तो ताड़कन उठला व निघून गेला.... पाणावलेल्या डोळ्याने  उर्मिलाने हॉटेलचे बिल भरले व ती घरी निघाली.
     
     त्यानंतर माधव उर्मिलेशी नीट वागत नव्हता. तो तिच्यापासून दूर राहु लागला. उर्मिला शांत होती. तिच्या कामात व व्यवहारात काहीच बदल झाला नव्हता,  पण तिच्या अंतरंगात माजलेली खळबळ ऑफिसमधे सर्वांना जाणवत होती. माधवचा अहंकार कमी झालेला नव्हता. त्याने संचालकाना सांगून स्वतःची बदली त्याच्या राहत्या जागेपासून जवळच निर्माण झालेल्या नव्या ब्रांचमधे करून घेतली. याबाबत त्याने उर्मिलाशी एका शब्दानेही चर्चा केली नाही किंवा तिला कळवलेही नाही. उर्मिलाला धक्का बसला. माधवने नविन ब्रांचचा चार्ज घेण्याअगोदर ऑफिसमधे सहकार्याना निरोपाची पार्टी दिली. त्याला जाताना पाहुन इतरांचे नसतील पण उर्मिलाचे डोळे डबडबून आले. तिच्या भावनांचा, मतांचा, माधवने कधीच विचार केला नाही याचे शल्य त्या डोळ्यातून बाहेर आले.

     मध्ये बरीच वर्षे निघून गेली. माधवच्या दोन्ही बहिणींची लग्ने झाली. उर्मिला एखाद्या पाहुण्यासारखी उपस्थित होती. एव्हाना तिच्या व माधवाच्या प्रेमसंबंधाची माहिती तिच्या दोन्ही बहिणींना कळली होती, पण दोघांमधे दुरावा निर्माण होण्यासाठी असे काय घडले? ह्याची कल्पना त्या दोघींना तसेच ऑफिसमधेही कुणालाच आली नाही. दोघांनीही ते रहस्य कुणासमोर उघड केले नाही. उर्मिलाची आई वारंवार उर्मिलाला विचारायची. "काय गं, पुढे काय? तू काही बोलतच नाहीस." यावर उर्मिलाचे एकच उत्तर असे .. "माझा रामराया आहे ना! तो घेईल सर्व काळजी. सगळं काही ठीक होईल. तू निश्चिन्त रहा."

     इकडे बहिणींची लग्ने झाल्यापासून, माधव एकटा पडला होता. त्याला आता एकटेपणा जाणवू लागला. उर्मिलाच्या आठवणीनी तो व्याकुळ होऊ लागला. सदैव बेचैन असायचा. एके दिवशी त्याला कळले उर्मिलाने ती नोकरी सोडली. तिच्या आई बरोबर व इतर सहकार्यांबरोबर मिळून एक संस्था निर्माण केली, जी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आधार देते, त्यांचे पुनर्वसन करते, त्यांना स्वतःच्या पायांवर उभी राहण्यासाठी आर्थिक व मानसिक मदत करते.
 
     आत्ता उर्मिलाने पन्नाशी ओलांडली व माधव पंचावन्न वर्षांचा झाला होता. कशीबशी माहिती मिळवून माधव तिच्या संस्थेत पोहोचला. बाहेर मोठ्या अक्षरात पाटी लिहीलेली होती. "साफल्य".  उर्मिलाचा चेहरामोहराच बदलला होता. पिकलेले केस व पांढऱ्या साडीत ती वयापेक्षा पोक्त वाटत होती. मधल्या काळात तिची आई निवर्तली, संस्थेचा भार ती एकटी सहकार्यांसोबत समर्थपणे वाहत होती. सरकारने तिच्या 'साफल्य' ह्या संस्थेसाठी व  कार्यासाठी मोफत जमीन उपलब्ध करून दिली. बऱ्याच दानशूर व समाजसेवी व्यक्तींनी संस्थेला सढळ हस्ते देणग्या दिल्या होत्या. जमिनीत आधुनिक पद्धतीने बारमाही पिक कसे काढावे, दुष्काळी परिस्थितीतही पिक कसे घ्यावे, पावसाच्या पाण्याचा वर्षभर विनिमय कसा होईल, त्यासंबंधी विविध रचना व कार्य कसे करावे, तसेच 24 तास वीजपुरवठा व्हावा ह्यासाठी सोबत सोलार सिस्टमचा वापर कसा करावा, सर्व गरजांची पूर्तता करणारी आदर्श व्यवस्था कशी असावी ह्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे "साफल्य" संस्था. 

     इथे शेतकऱ्यांच्या मुलाना शेतीचे तसेच इतर आवश्यक शिक्षण देण्यासाठी एका वेगळ्याच धर्तीवर विशेष शाळेची निर्मिती केलेली होती. सेवाभावी तरुण व आजुबाजूच्या परिसरातील विद्यार्थी इथे श्रमदानाची सेवा नियमित देत असत. सहजच माधव उर्मिला संस्थेत कुठे राहते ते पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांबरोबर गेला. एक छोट्याशा दहा बाय दहा च्या खोलीत तिचे वास्तव्य होते. त्यात एक पुस्तकांचे कपाट, कॉम्प्युटर व्यवस्था, एक कॉट व कपड्याची ट्रंक, एवढ्याच वस्तु. कोनाड्यात एक छोटेखानी देव्हारा.. त्यात सीतामाता व भ्राता लक्ष्मणासह श्रीरामप्रभू विराजमान, समोर तेवत असलेले निरांजन व अगरबत्तीचा सुगंध, एका पवित्र मंदिराचा आभास निर्माण करत होते. भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहिले होते, "शेतकरी जगला, तरच देश जगेल. शेतकरी जगलाच पाहिजे व तो ही मानाने." माधवला संस्थेची माहिती देऊन कार्यकर्ता निघून गेला. उर्मिला आपल्या कामात मग्न होती. निघताना तिला भेटण्यासाठी माधव गेला.

     आयुष्यात आपण काय गमावलय ह्याची त्याक्षणी माधवला मनोमन जाणीव झाली. पश्चातापाने त्याच्या डोळ्यात पाणी आले. आपल्या अहंकाराने व गैरसमजाने आपण स्वतःचे जीवन कसे उध्वस्त केले त्याची जाणीव होऊन त्याने उर्मिलाला हात जोडून नमस्कार केला. उर्मिलाचा चेहरा निर्विकार होता. प्रेमात उध्वस्त झालेल्या एका संस्कारी स्त्रीने इतरांच्या जीवनात आनंद पसरवला होता. मनोमन तिची माफ़ी मागून त्यावेळी माधव घरी परतला आपण केलेल्या अक्षम्य चुकीचे शल्य मनात ठेवून,कायमच… 
आणि ते शल्य उर्मिला गेल्यानंतरही मनातून गेल नाही.

     उद्विग्न मनस्थितीत काल रात्रभर जागलेला माधव, पहाट होताच ड्रायव्हरला घेऊन साफल्याच्या दिशेने निघाला. मनात पहील्या भेटीपासून.....हॉटेलमध्ये कॉफी घेतानापर्यंतचे उर्मीलाचे विचार आठवून तो पश्चातापाच्या अग्नीत होरपळत होता. त्याच्या कृतीची त्याला स्वत:लाच घृणा वाटत होती. अपराधीपणाच्या भावनेने मेंदु बधीर झाला. विचाराने त्याला ग्लानी येउ लागली. "साफल्य" आले साहेब'..... ड्रायव्हरच्या आवाजाने माधव भानावर आला. तोंडावर पाणी मारुन, चेहरा पुसत माधव प्रवेशद्वारावर पोहोचला. 

     अंतिम संस्कार विधि उरकले गेले होते. धाय मोकलुन रडणारी तेथील शेतकऱ्यांची कुटुंबे व आश्रमातील सेवक वर्ग पाहुन कधी नव्हे तो माधवने पहिल्यांदाच हंबरडा फोडला. उर्मिलाsss.. तिच्या चितेची राख मस्तकी लावून माधव  तिच्या दहा बाय दहाच्या घराकडे निघाला.  देव्हार्यात निरांजन पेटवण्यासाठी म्हणून तो  देव्हार्याकडे  वळला. भगवान श्रीरामप्रभु व सितामाता कसल्यातरी विचारात मग्न दिसले. शेजारी भगवान लक्ष्मणाची मूर्ति नव्हती. माधव मुर्छीत अवस्थेत कोसळला. तेथील कर्मचार्यानी माधवला सावरले. भानावर आलेल्या माधवने  खिशातून पेन काढून  स्वत:चे मृत्युपत्र लिहीले संस्थेला मदत म्हणून त्याची सर्व संपत्ती दान केली. संस्थेचे व्यवस्थापक आले त्यानी माधवला एक पत्र दिले. माईने हे पत्र तुमच्यासाठी ठेवले आहे. सर्व जण आदराने उर्मिलाला माई म्हणत. बंद लिफाफ्यावर नाव लिहीले होते. माधव क्षोत्री. थरथरत्या हाताने माधवने तो लिफाफा उघडला.
    
प्रिय माधव,
माधव! स्त्रीचे जीवन हे एखाद्या तसबीरीच्या फ्रेम सारखे असते. लोक नेहमी तसबीरीच्या आतील दृश्याकडे पाहतात व सुखावतात, पण फ्रेम सहजासहजी कोणाच्या लक्षात राहत नाही. तिच्या चौकटीने ती सदैव आतील चित्राचे रक्षण करत असते. व ही चौकट ढासळू नये म्हणून बाहेरील प्रहार सोसत, मानापमानाची पर्वा न करता झीजते. तिच्या चौकटीत सामावलेल्या विश्वाला सुखी करण्यासाठी! चौकटीतील प्रत्येक बाजू एकमेकांशी सांधून ती हा डोलारा सांभाळत असते. त्याला परिवार म्हण, कुटुंब म्हण किंवा घर म्हण. माझ्या मते कुटुंब असेच असावे. चार चौकटीतील वरील बाजू ही भगवंतावरील विश्वासाची असते.. त्याच्या शेजारीच मागे असलेेला हुक म्हणजे आदिमाता, विश्वाच्या डोलार्याप्रमाणेच प्रत्येकचा आधार. जी सदैव असते. पण आपली नजर तिथे पोहोचत नाही. संपूर्ण फ्रेमला असलेला तो महत्वाचा आधार! उजव्या व डाव्या बाजूला असलेल्या दोन बाजू म्हणजे, सासर व माहेर.. खाली असलेली आडवी बाजू म्हणजे तिचा पति.. जो सासर व माहेर ही दोन्ही नाती जपत, आत असलेल्या कुटुंबाला सावरण्याचे कार्य करतो. ह्या बाजूचे महत्व तिच्यासाठी खूप, खूपच आहे. हुकमधुन निसटलेली फ्रेम पूर्ण उध्वस्त होते. पण खालच्या बाजूची पट्टी निसटली तर, इतर बाजूच्या पट्टया असूनही. आतले कुटुंब मात्र उध्वस्त होते. तुला फ्रेम कधी कळलीच नाही माधव.

उर्मिला...