जेथे जातो तेथे तु माझा सांगाती



     गुढी पाडव्याच्या दिवशी कुटुंबाबरोबर बसून टीव्ही सिरीयल पहात होतो. प्रसंग असा होता, एका कंपनीत मालक अकाउंटंट ह्या पदासाठी पेपरात जाहीरात देणार आहे. जुन्या अकाउंटंटला ह्या गोष्टीची माहीतीच नाही. पण त्याच्याबद्दल आपुलकी असलेले मित्र पुरते भांबाउन गेलेत, बेचैन झालेत. त्याना त्यांच्या त्या जुन्या मित्राची नोकरी वाचवायची आहे. त्याना त्या मित्राची, त्याच्या कुटुंबाची काळजी वाटते आहे, व त्यासाठी ते बॉसबरोबर बोलण्याचे ठरवताहेत. पुढे काय होणार? हे पुढच्या भागात कळेल. पण......................


     आज कालच्या कॉर्पोरेट युगात हे सामान्य झालय. सर्रासपणे चाललय. सकाळपर्यंत हसतखेळत काम करणाऱ्या कामगाराला संध्याकाळी निघताना अचानक सांगीतले जाते. मि. कुलकर्णी तुम्ही अकाउंटस् डिपार्टमेंटमधून तुमचा हिशोब घेउन जा. कंपनीला तुमच्या सेवेची सध्या गरज उरली नाही. तुमच्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक केली आहे.


"काय भयानक प्रकार आहे हा. कसलेही तारतम्य नाही. कसली माणुसकी नाही. माणसे म्हणजे काम करणारी मशीन्स आहेत का रे.... ?, त्याना काही भावना आहेत की नाही? इतकी वर्षे त्याने त्या कंपनीत सेवा दिलीय. त्या साठी त्याने त्याचे कौशल्य वापरलय, वेळप्रसंगी घरादाराकडे दुर्लक्ष केलय. मुलाबाळाना वेळ न देता, ओव्हरटाइम करुन तो खपलाय तुमच्या कंपनीसाठी. तुमच्या...??? त्याने स्वःताची कंपनी म्हणुनच काम केलय तिथे. जेवढा घरात नाही तेवढा वेळ तुमच्या कंपनीत वावरलाय तो.  त्याच घरच होत ते." 
  
     "बाबा आज मला फिरायला घेउन जा म्हणणाऱ्या  मुलांसाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. आजारी आईला दवाखान्यात नेण्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. बायकोला सासुरवाडीला नेण्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. तुमच्यासाठी राबराब राबलाय तो. तुमची कामे होत होती तोवर तो तुमच्या कंपनीची शान होता. त्याच्या कर्तुत्वाने तुमची छाती फुगत होती. त्याचे कौतुक करताना तुमचे तोंड थकत नव्हते. मग का? का? असे वागलात त्याच्याशी ?
का ?"
     अजय तावातावाने एकटाच बोलत होता. सर्वजण स्तब्ध होते. कुणाकडे उत्तर नव्हते त्याच्या प्रश्नांवर. सर्वांच्या माना खाली होत्या. हतबल होते त्याचे सर्व सहकारी. 

         साधारण ३० वर्षांपुर्वी घराची जबाबदारी खांद्यावर घेतलेला अजय,     शिक्षण अर्धवट सोडुन नोकरी करु लागला. शिक्षण पुर्ण करता आले नाही म्हणून बेचैन असणारा अजय आता समजूतदार झाला होता. त्याचा त्याच्या देवावर विश्वास होता. मिळेल ते काम करत, नवीन नवीन गोष्टी आत्मसात करत तो  सर्व कामांत तरबेज झाला. त्याच्या निरपेक्ष वागणुकीने त्याने सगळ्याना आपलेसे केले होते. मोठ्या मोठ्या कस्टमरची कामे अजयने शिताफीने केल्याने ते खुष असत. त्यानी दिलेली बक्षीसे तो प्रेमळपणे नाकारत होता. पैश्यापेक्षा प्रतीष्ठा महत्वाची. पण  अजयकडे एक दुर्गुण होता. खर तर त्याला दुर्गुण म्हणायचे का? हाच एक प्रश्न होता. तो सडेतोड स्वभावाचा होता. मनात काहीही  आडपडदा न ठेवता तो निर्भीडपणे आपली मते मांडायचा. चापलुसी, बोटचेपेपणा, हाजी हाजी असला प्रकार नव्हता त्याच्या स्वभावात.
         
  
     काळानुसार संचालक मंडळी बदलत गेली. नवी मंडळी हेकेखोर व ढगात उडणारी होती. त्यांच्या चुकीच्या निर्णयाना अजयने विरोध केला. त्यांच्या चुका निदर्शनास आणुन दिल्या. कंपनीचे होणारे  नुकसान अजयची बेचैनी वाढवत होते. पण ह्या कॉर्पोरेट जगतात एक चुकीची पद्धत रुढ झालीय. "बॉस इज अल्वेज राइट". पण अजय हे वेगळेच रसायन होते. तो बॉसचा आदर करायचा, तसेच त्यांच्या चुका ही त्याना दाखवून द्यायचा. पुढे  जे व्हायचे तेच झाले. त्यांच्या डोळ्यात तो सलु लागला. ते अजयला टाळू लागले. त्याच्या शब्दाना होणारा विरोध पाहुन अजय आता  शांत बसू लागला. संचालकानी त्याची चारी बाजूने कोंडी केली होती. पिंजऱ्यात फडफडणार्या पक्षाप्रमाणे त्याची गत झाली होती. 

     "वय वाढलेला अजय, आता ही नोकरी नाविलाजाने करणार, त्याला या वयात या पगाराची नोकरी कोण देणार? संचालक मंडळ उवाच". ते अजयला खूप त्रास देउ लागले. पण म्हणतात ना, परमेश्वराच्या काठीला आवाज नसतो. ती ज्याच्यावर बसते त्यालाच कळते. 

      एक दिवस अचानक अजयच्या समोर एक व्यक्ती येउन ठाकते. त्या व्यक्तीच्या पडत्या काळात त्याला अजयने निरपेक्षपणे केलेली मदत त्याच्या ध्यानात असते. अजय त्याच्याकडे मन मोकळे करतो.

परमेश्वराची अगाध लीला काय असते पहा.


हा सदगृहस्थ आता खूप मोठा झालेला असतो. तो अजयला त्याच्या कंपनीत ऑफर देतो. अटी पाहील्यावर परमेश्वराच्या अकारण कारुण्याची झलक दिसतेच.


अट १ मी तुझा इंटरव्ह्यु घेणार नाही


अट २ माझ्या कंपनीत तु तुला जे आवडेल ते काम करावयाचे.


अट ३ तुला येण्याजाण्याची सोयीची वेळ तु ठरवायची.


अट ४ नवीन काम शिकण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही.


अट ५ सर्वात महत्वाची तुला आता जेवढा पगार आहे तेवढा मी देणार.

     आज अजयच्या विठ्ठलाने त्याला त्याच्या नकळत कडेवर उचलून घेतले होते. व त्या पांडुरंगाला मिठी मारुन अजय त्याला प्रेमाश्रुनी चिंब करत होता.

सदर घटना एका सत्य कथेवर आधारीत आहे 
पात्राचे नाव बदलले आहे.

2 comments:

  1. संजय आजच्या काळात नोकरी मध्ये हा जीवघेणा घाव कोणावरही पडू शकतो परंतु सत्याशी प्रतारणा न करता निर्भीडपणे ताठ मानेने जगणारा दुर्मिळच जीव असतो, पण "तो" एकमात्र पाठीराखा आपल्या लेकराला कधीच उणीव भासू देत नाही कारण अंतिम विजय हा सत्याचाच असतो. "त्या"च्या काठीला आवाज नसतो आणि "तो" परमात्मा पूर्ण न्यायी आहे ह्या वर विश्वास ठेवणार्‍याच्या पाठी यश स्वत: धाव घेते. अवाक् करतात तुमचे लेख !!!

    ReplyDelete