चंदनयात्रा


     उगवत्या सुर्याला अर्ध्य देताना अण्णाचा हात थरथरत होता. आता हे नित्याचेच झाले होते.  अर्ध्य देताना आण्णा हल्ली एक वाक्य नेहमी पूटपूटत असे. पुरे झाले, आता लवकर बोलव रे रामेश्वरा. कशास मागे ठेवलस रे बाबा.

     गावावरुन मुंबईला शिकण्यासाठी आला आणी चाकरमानी झाला. तरी आण्णाला इथे करमत नव्हते. दिवस कसाबसा निघून जायचा पण रात्र तळमळत काढायचा. खाणावळ्याच्या घरात, गँलरीत निजताना गावाकडील आठवणीने गलबलून यायचे. गावचे घर, आईबाप, भावंडे, शेत, गोठा, बैल सगळे आठवून आण्णा उशी ओली करायचा. दिवस पुढे ढकलत ढकलत कमी खर्चाच्या खाणावळी बदलत बदलत आण्णा एकदाचा परबाकडे स्थिरावला. परब बाकी देवमाणूस हो, अडल्या नडल्यासाठी धावायचा. खाऊनपिउन सुखी, कुटुंबवत्सल. गावकऱ्यां चे खूप कौतुक परबाला. आल्यागेल्याकडे गावातली चौकशी करायचा आणी आठवणींची गाठोडी सोडायचा.

     धटधाकट दांडगा बाप, त्याला साप डसला, खूप धावपळ केली पण वाचला नाही. त्या दिवसापासून आईने अंथरुण धरले, हाय खाउन चार पोराना वार्यावर सोडुन महीन्याभरात बापामागोमाग गेली. परब सगळ्यात थोरला आणी धाकली फक्त २ वर्षाची. पोरका झाला परब. बापाची बहीण, परबाची आत्या बाकी धीराची, परबाला सांगीतले "हिम्मत कर आणी मुंबईला जा ह्या तीघाना मी बघते". 

     होळीत शेवटचा नारळ टाकून परबाने रडत रडत चाकरमान्यांबरोबर मुंबई गाठली. त्याच्या आयुष्याचीच  होळी झाली होती. १२ वर्षाचा कोवळा जीव, मिसरुड पण फुटले नव्हते. तालुक्याच्या बाहेर पाऊल न टाकलेला परब मुंबइत भांबावला होता. नवतीचे दोन दिवस संपले, शिक्षण नव्हते. कसाबसा महिना गेला. फुकट कोण खायाला घालते? टक्के  टोमणे ऐकून धायकुतीला आलेला परब रात्रीचा पिशवीत दोन कपडे टाकून बाहेर पडला. रस्त्यात रडत रडत भटकणार्या परबाला एका पारशाने पाहीले. पारशाच्या अनुभवी नजरेला ते जाणवले. त्याने परबाला जवळ बोलावून विचारपूस केली. आईबापानंतर इतक्या प्रेमाने कुणी विचारले नव्हते. परबाचा बांध फुटला, पारशाचा सदरा भिजवुन परब शांत झाला. पोरच तो, पोरकटच होता. आशेने किलकिल्या नजरेने तो पारशाकडे पहात होता. त्या चिमुरड्या जीवाच्या नजरेने पारशी घायाळ झाला होता. त्याने परबाला विचारले "माझ्याबरोबर येशील का? लहानसहान काम कर, पोटापाण्याची व्यवस्था मी करीन". परबाला पारशाच्या रुपात देवच भेटला होता.

     पारशी भला माणूस, चंदनाचा व्यापारी होता. तसेच इतर छोटेमोठे धंदेही होते त्याचे. पण मुलबाळ नव्हते. परब ईमाने ईतबारे मेहनतीने पारशाला कामधंद्यात मदत करु लागला. विश्वासु असल्यामुळे सगळ्यांचा जीव बसला त्याच्यावर. पारशाची बायको गुलरुख त्याला मुलाप्रमाणेच वागवत होती. आता गावी मनीऑर्डर जाउ लागली व परबाच्या आतेने सुटकेचा निश्वास सोडला. परबाची घरची स्थीती कळल्यावर पारशाने परबाच्या भावंडाना मुंबईला आणले. त्यांचे शिक्षण केले. परबाला तो स्वताच्या मुलाप्रमाणे वागवत असे. परबानेही कधी पायरी ओलांडली नाही. तो पारशाच्या कामकाजात रात्रंदिवस राबत होता. पारशाने परबाचे लग्न लाउन दिले. व त्याला तिथेच आडोशाला संसार थाटून दिला. दिवस सरत होते. परबाने ४० शी गाठली होती. पारशी आता थकला होता. परबच पारशाचे सर्व व्यवहार सांभाळू लागला. पारशाला आता शेवटचे वेध लागले होते, पारशाला मूलबाळ नव्हते. त्याने नातेवाईकांच्या नाकावर टिच्चून परबाला स्वताचा कायदेशीर वारस केला. कायद्याने परब आता सुखदेव मर्झबान चंदनवाला झाला होता. 

     परबाने भरल्या डोळ्याने ती कागदपत्रे देव्हाऱ्यात रामेश्वराच्या चरणावर ठेवली.  नमस्कार केला आणी शपथ घेतली. "हे देवा महाराजा मी  कोणाचो कोण?  मी तुका कधी बघीतलय नाय, पण ह्या पारशात माका तुजाच रुप दिसता. आज ह्यो नसतो तर रस्त्यार भीक मागत फीरलय आसतय. ह्यो दिवस बघूक मिळालो ही तुझी कृपा. आज तुझ्या पायाक हात लावन शपथ घेतय आजपासून माझ्याकडे येणार्या अडल्या नडल्या मानसांका जमात तशी मदत करीन, पन माझ्यासारखे ते दिवस वैर्याच्यापन नशीबात देव नको रे रामेश्वरा........."
बापाच्या डोळ्यातील अश्रु बघून परबाची मोठी झालेली मुलेही हेलावली व देवाला नमस्कार करुन निघून गेली.

      आण्णा कानात जीव आणून परबाची  सर्व कथा ऐकत होता. त्याला खुप हायसे वाटले. परबाने त्याला आसरा दिला. आण्णाला पोष्टात नोकरी लागली. कवडी कवडी जमवून आण्णाने घरटे बांधले, लग्न झाले सुशीलेसारखी सुशील बायको मिळाली. मुले झाली, शिकली सवरली, त्यांची लग्नकार्ये झाली. मोठी झाल्यावर घरटी सोडुन भरारी घेता घेता परदेशात स्थिरावली, ती पुन्हा माघारी आलीच नाही. सुशीलेच्या सोबतीत आण्णा स्वप्नातच नातवंडाशी खेळायचा. सुशीला पोरांच्या आठवणीने खंगत चालली होती. एकदा जिन्यावरुन घसरली आणी कंबरेत मोडली.

     आण्णा सून्न झाला. सुशीलाचे सगळच आता बिछान्यावरच होत होते.
आण्णा या वयातही  तिचं सर्वकाही स्वताच करत होता, जिद्दीने.   "कुटुंबासाठी खपली सुशीला, तिला परक्या हातात का सोपवू?" कसाबसा महीना काढला सुशीलाने. तीचे करताना आण्णाचे होणारे हाल सुशीलेच्या  जिव्हारी लागत होते.  त्या दिवशी सुशीलेने आण्णाला जवळ बोलवुन कनवटीला लावलेली उदीची पुडी त्याच्या  हातात दिली व म्हणाली पोरानी साथ दिली नाही, पण हीने जपले हो शेवटपर्यंत. बोलताबोलता सुशीलेचा हात सुटला. आण्णाचा हंबरडा ऐकुन चाळ धावली. आण्णाच्या नशीबी सुशीलेस भडाग्नी देण्याची पाळी आली. आण्णा आंतरबाह्य हलला ह्या घटनेने. त्याचा हंबरडा ऐकून माघ महीन्यातसुद्धा वरुणराजाने हजेरी लावली. आण्णाला आता कसलीच इच्छा उरली नव्हती. उगवत्या सुर्याला अर्ध्य देणे व संधीकालात तुलसीजवळ दिवा लावणे. सुशीलेचे कार्य तो  नेटाने पुढे नेत होता. पण आज काहीतरी वेगळेच वातावरण होते.  सुर्य बाहेरच येत नव्हता. ढगांत दडी मारुन बसला होता. नेहमीप्रमाणे अर्ध्य देता देता आण्णा अर्ध्यावरच कोसळला. आण्णाची तार रामेश्वराला पोचली. त्या दिवशी चाळीत कुणाची चूल पेटली नाही. सगळे हळहळत होते. कुठुन तरी परबाला खबर लागली. डोळ्याचा खाचा झालेला परब मुलांबरोबर स्मशानात पोचला. परबाच्या मुलानी सर्व व्यवस्था चोख ठेवली होती.

     सर्वजण आण्णाला चंदनाच्या लाकडांवर ठेवून शेवटचे दर्शन घेत होते. सगळ्यानी साश्रु नयनानी आण्णाचा निरोप घेतला. परबाला आधार देत त्याच्या मुलानी चितेजवळ नेले. थरथरत्या हाताने परबाने अग्नी दिला व आकाशात पाहून कुजबुजला. तुमची परंपरा जपली हो ह्या सुखदेव मर्झबान चंदनवालाने. आयुष्याचे चंदन केले हो तुम्ही. स्वतः झिजलात त्याचा सुगंध अजुन दरवळतोय अवतीभवती.

     तिथे सर्वत्र चंदनच होते. परबाच्या तीन लहान भावंडाना सांभाळत त्याची आत्या चंदनासारखी झिजली. परबाने आयुष्यभर अडल्या नडल्यांसाठी हाडे  चंदनासारखी झिजवली. पारशी दांपत्याने पोरक्या परबाला बापाची माया देउन आयुष्याचे चंदन केले. आण्णा कुटुंबासाठी चंदनासारखा जळला. सुशीला पोरांच्या विरहाचे दुःख विसरुन चंदनकाष्ठाप्रमाणे आण्णाबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत उभी राहीली. जाताजाता मोडली पण जाताना आण्णाच्या हातात साईनाथांची उदी देउन स्वताच्या जीवनयात्रेचेच चंदन केले. आण्णा, सुशीला, परब ही सर्व साधी व देवभोळी माणसे दैवाला दोष न देता दुसऱ्यांसाठी झटणारी. स्वतः झिजून इतरांच्या जीवनात सुगंधाचा दरवळ पसरवणारी चंदनाची काष्ठे. आणि त्यांची ही चंदनयात्रा.

3 comments:

  1. संजय आपल्या ब्लोगचे "मनतरंग" हे शीर्षक खूप अनोखे आणि आपल्या लिखाणाला साजेसे आणी समर्पक आहे. आपले लिखाण खूपच अप्रतिम, मनाचा ठाव घेणारे आणि बोलके आहे.

    साधी व देवभोळी माणसे दैवाला दोष न देता दुसऱ्यांसाठी झटणारी. स्वतः झिजून इतरांच्या जीवनात सुगंधाचा दरवळ पसरवणारी चंदनाची काष्ठे. आणि त्यांची ही चंदनयात्रा - हे उद्गार खूपच भावपूर्ण आहेत. काळजाचा ठाव घेणारी हृदयस्पर्शी कहाणी वाचताना डोळे पाणावले नकळतच.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete